Translate this blog

banner

Wednesday, July 13, 2011

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई ट्रेक....

९ जुलै २०११ 
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई ट्रेक..(५४०० फुट)


ट्रेकर्स मंडळी वार्मअप करण्यासाठी आणि पावसाळी ट्रेकिंग सीझनचा श्रीगणेशा करण्यासाठी नेहेमीच हलक्याफुलक्या परंतु तितक्याच प्रेक्षणीय जागेच्या शोधात असतात. आम्ही पाऊलवाटा चमूने निवडला - कळसुबाई!
रात्री १२च्या सुमारास माधव, मकरंद, विनायक आणि अक्षय ओम्नी गाडीने  मुंबईहून निघाले,आम्ही एकूण ९ जण होतो. चौघे मुंबईहून निघाले आणि आम्ही बाकीचे पाचजण कल्याणहून निघालो त्यात तिघे (विजय,रवींद्र,संदीप) खोपोलीचे आणि आम्ही दोघे (मी,विष्णू) कल्याणचे.
चेम्बुरहून निघालेल्या कार ने तासाभरात कल्याणला आम्हाला पिकअप केले. कल्याणला गाडीवर लावलेला भगवा झेंडा गाडीची शान वाढवू लागला.वाटेत कसारा बायपासला रात्री २च्या सुमारास चहा आणि  शेव भाजी वर ताव मारला. तासभर गप्पा रंगल्या. 


गाडीत बसल्याबसल्या पुन्हा आमच्या गप्पांचा विषय होता तो इकडचे सामसूम हायवे जिथे दरोडे पडतात म्हणून रात्री कोणीच गाडी न थांबवता सुसाट वेगाने निघून जातात, या विषयावर आमच्या गप्पा मस्त रमल्या,थोड्याच वेळात आमच्या पैकी बऱ्याच जणांना झोप लागली आणि जे नको व्हायला पाहिजे होते तेच झाले. घोटी वरून आत शिरल्यावर आम्ही रस्ता चुकलो होतो, मुख्य रस्ता सोडून आम्ही भलतीकडेच जात होतो. बरेच अंतर कापून गेल्यावर आम्हाला जाणीव झाली कि आम्ही रस्ता चुकलो आहोत. मधेच रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवून कोणी मदत करते का ते बघण्यासाठी माधव खाली उतरला! जश्या काही वेळापूर्वी आमच्या गप्पा रंगल्या होत्या त्याचा अनुभव आम्हाला आलाच....कोणीच गाडी थांबवायला तयार नव्हते. आजू बाजूला किर्र अंधार होता आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. मनात नको नको ते विचार सुरु झालेच पण तितक्यात एक मोटारसायकलवाला तिथून चालला होता, त्याने गाडी थांबवून आम्हाला योग्य रस्त्यावर जाण्यास मदत केली तेव्हा सकाळचे ५ वाजले होते. त्या भल्या गृहस्ताला जय महाराष्ट्र! करून आम्ही बारीच्या दिशेने निघालो तेव्हा कुठे हायसे वाटले. पण..... तितक्यात नवीन संकट उभे राहिले! बारी ला पोहोचण्याच्या १०-१५ किलोमीटरच्या टप्प्यात  मकरंदला झोप येऊ लागली म्हणून माधवने गाडी चालवण्याचा निर्णय घेतला!! आणि आमचा जीव परत टांगणीला लागला. आयुष्यात प्रथमच गाडी चालवणाऱ्या माधव ने सार्यांनाच थरारक प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव दिला.
इगतपुरी-घोटी मार्गे ५.४५ च्या सुमारास बारी ह्या पायथ्याशी असलेल्या गावात आम्ही पोहोचलो. गरम गरम शेव पोहे आणि चहाचा नसता केला आणि गावातच जेवण तयार करण्यास सांगून ठेऊन ६.३०ला चढाई सुरु केली.

                                                                                                    कळसुबाई मंदिर
गुढगाभर थंडगार पाण्याचा ओढा पार करून मग गावामागील टेकडावर चढाई केली, पुढील ५ मिनिटातच पायथ्याशी कळसुबाई देवीचे मंदिर लागले, दर्शन घेऊन आणि थोडे फार फोटो काढत डावीकडील डोंगरावर आम्ही कूच केली. पाउस अविरत कोसालातच होता. थोडे अंतर पार करून गेल्यावर रेलिंग आणि लोखंडी शिड्या लागल्या तसेच बऱ्याच ठिकाणी पायऱ्याही होत्या. मधेच येणारा थंडगार वारा ट्रेक आनंददाई करत होता. दीड तासानंतर तीन शिड्या पार करून आम्ही विहिरी जवळ आलो. जरावेळ आराम करून अखेरची चढाई सुरु केली. पुढील २० मिनिटातच आम्ही शिखरावर पोहोचलो! वरती कळसुबाईचे देखणे भगव्या रंगातले मंदिर होते. वरती  प्रचंड गार-गार वारा सुटला होता...घोंगावणारा! बोचणारा!
थोडेफार फोटोशेशन झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, प्रसन्नता,कार्यपूर्तीबद्दल स्वतः विषयीचा अभिमान दिसत होता. शेवटी ९.३० वाजता खाली उतरायला प्रारंभ केला.सावकाश उतरत ११.३०च्या सुमारास गावात परतलो!
तासभर आराम केला, प्रत्येकाच्या मनात जुन्या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या मग १ वाजता गावरान चिकन, मटकीची मसालेदार उसळ, भाकरी यावर भुकेल्या राक्षसांनी ताव मारला.१-२ तास वामकुक्षी झाल्यावर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.भंडारदरा धरणाला भेट देण्याचा विचार होता
परंतु तिथे असणाऱ्या संभाव्य गर्दीची शक्यता लक्षात
 घेऊन तो मोह आम्ही टाळला. दुपारी ३.१५ला बारीहून निघालो. संध्याकाळी ५.३०ला आम्ही कल्याण-भिवंडी बायपासला पोहोचलो, पुढे गरमागरम चहा घेऊन आम्ही पाचही जण कल्याणला परतलो आणि बाकीचे ६.३० च्या सुमारास मुंबईला पोहोचले. आमच्या ग्रुप मधील मकरंदचे विशेष कौतुक कारण त्याने ट्रेकिंग सोबत ७ एक तास न कांटाळताना छान सेफ अशी ड्रायविंग देखील केली व आमचा प्रवास सोपा केला आणि त्याला माधवने  देखील गाडी चालवायला छान साथ दिली. गाडीतून परतताना आमच्या डोक्यात विचार होते ते कि ट्रेक चे पुढचे ठिकाण कोणते ह्याचे.     
सामील गडी:
निशांत, विजय, विष्णू,रवींद्र (मकरध्वज) ,संदीप,माधव,विनायक,अक्षय आणि मकरंद.

प्रवासाचा एकूण खर्च माणशी ५०० रुपये ज्यामध्ये पेट्रोल, रात्रीचा अल्पोपहार,सकाळची न्याहारी, शिखराजवळची कांदाभजी आणि चहा आणि दुपारचे पोटभर जेवण समाविष्ट होते.





View Larger Map