Translate this blog

banner

Wednesday, August 7, 2013

भंडारदरा धरण




३.०८.२०१३ भंडारदरा धरण 

नमस्कार,
अनेक दिवसांपासून कुठे तरी बाहेर पावसाळी पिकनिक करायचे असा विचार चालू होता पण वेळ मिळत नव्हता.  आणि अचानक आमचे ठरले ते भंडारदरा येथे जायचे.  शुक्रवारी रात्री निलेश सोबत बोलून प्लान आखला. 
शनिवारी सकाळी कल्याण वरून ९. ३९ ची कसारा रेल्वे पकडून आम्ही दोघे निघालो.  निलेशने घोटी ला
येण्याचे सागितले तसे आम्ही कासारयाला उतरून ओमनी ने घोटीला उतरलो, पहिला टोलनाक्या पुढे निलेश आणि प्रियांका त्यांच्या कारच्या बाहेर आमची वाट पाहताच होते. लगेच आम्ही निघालो भंडारदर्याला. बर्याच दिवसांनी आम्ही भेटलो होतो. दोघांना भेटून खूप छान वाटले. 

घोटीचे वातावरण खुप छान आणि फ्रेश होते. त्यावरून अंदाज आलाच कि पुढे कसे असेल... काही वर्षांपूर्वी कळसुबाई ला गेलो होतो त्यानंतर आता त्या मार्गावरून चाललो होतो. जुन्या आठवणी सगळ्यांना सांगत आणि मज्जा करत आम्ही रस्ता कापत होतो. 


घोटीवरून जवळजवळ ४० किलोमीटरवर भंडारदरा धारण आहे.  पिकनिक स्पॉट धबधबा आणि अभयारण्य असे दोन स्पॉट तिथे आहेत. 
धरणावर आणि जवळच्या गार्डन मध्ये थोडे फोटो काढून आम्ही धरण दरवाज्याजवळ यायला निघालो तेव्हा मधेच एक आजोबा भेटले, त्यांनी सांगितलेल्या माहिती नुसार त्यांना इंदिरा गांधींच्या हस्ते पशुपक्षांचे आवाज काढण्यासाठी सुवर्ण पदक मिळाले होते. थोडी करमणुक म्हणून आही त्यांना आवाज काढायला लावले. त्यांचा विडीओ शुट करण्याचा मोह मला आवरला नाही. तुमच्यासोबत शेअर करत आहे. एकदा नक्की बघा.

भंडारदरा धारणाबद्दल मला मिळालेली माहिती अशी... 
भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथे भंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भौगोलिक अक्षांश- १९ ३१उत्तर; रेखांश ७३ पूर्व.

भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.
भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.
भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे. हा प्रदेश महर्षी अगस्ती आणि महर्षी वाल्मिकी अशा ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेला असून जवळच अकोले येथे महर्षी अगस्ती यांचा आश्रम व आजोबाचा डोंगर येथे महर्षी वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. प्रवरेच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की अगस्ती ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देव पृथ्वीवर अवतरले व त्यांनी गंगेचीच एक धारा असलेली प्रवरा नदी इथे प्रवाहित केली. प्रवरा नदीचे पाणी हे अमृतासमान असून म्हणून नदीला "अमृतवाहिनी" असे म्हटले जाते.

मुख्य आकर्षण
भंडारदरा हे एक अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेले पर्यटनस्थळ असुन दरवर्षी विविध ठिकाणांहुन येथे भेट देणारांची संख्या वाढत आहे. बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शकांचे हे एक आवडते स्थान असुन कित्येक प्रसिद्ध हिंदी/मराठी चित्रपटांचे चित्रीकरण याच परिसरात झालेले आहे. (कटी पतंग, हीना, राम तेरी गंगा मैली, राजू चाचा, आणि देऊळ हे त्यांपैकी काही चित्रपट होत.)
कळसूबाई
भंडारदरा परिसरातच कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे मंदीर आहे. नवरात्रात इथे दररोज हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. शिखरावरुन दिसणारे परिसराचे दृश्य अतिशय मनमोहक असे आहे.
अम्ब्रेला फॉल
विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा असून त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला 'अम्ब्रेला फॉल' असे म्हणतात. धरणाचे आवर्तन सुरु असताना खुप दुरवरुनही अम्ब्रेला फॉल बघता येऊ शकतो. मात्र हा अम्ब्रेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यांतच पहायला मिळतो.
रंधा फॉल
शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजुने अजुन एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पुर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे.
रतनवाडी
भंडारदऱ्याहुन बोटिंगचा आनंद घेत रतनवाडी येथे जाता आहे. रतनवाडी येथे अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंती मंदीर आहे. या मंदीरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असुन त्यात मुख्य गाभाऱ्यात एक् शिवलिंग आहे. पावसाळ्यात हे शिवलिंग पुर्णत: पाण्यामध्ये बुडालेले असते. रतनवाडी परीसरात अनेक धबधबे असुन गळ्यातील हारासारखा दिसणारा 'नेकलेस फॉल' हा विशेष लोकप्रिय आहे.
घाटघर
शेंडी येथुन पश्चिमेकडे २२किमीवर घाटघर हे निसर्गसौंदर्याने नटलेले एक गाव आहे. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा प्रवास अतिशय आनंददायी आहे. घाटघर गावचा कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असुन इथुन कोकण आणि सह्याद्री पर्वताचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते. इथे अनेक धबधबे असुन पावसाळ्यात हा संपुर्ण परिसर धुक्यात हरविलेला असतो. घाटघरला खुप पाऊस पडतो म्हणुन यास नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असे म्हंटले जाते.

जसजसे धरण जवळ येत होते तसतसा आम्हा चौघांचा उत्साह वाढत चालला होता. धरणावर पाहिलेपासून आलेले निलेशचे मोठे भाऊ हेमंत जंबे आणि त्यांचे कुटुंब भेटले, ते सुद्धा त्यांची कार घेऊन आले होते. सर्वांसोबत बराच वेळ धबधब्याखाली धम्माल मस्ती केली आणि फोटो काढले नंतर सपाटून भूक लागली आणि जवळच मिळणारा भेळभत्ता आम्ही सर्वांनी मिळून खाल्ला. मधेच पाऊस पडत होता मधेच ऊन पडत होते, आणि त्यात हिरवीगार झाडी.... मधेच येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे निसर्ग खूप सुंदर दिसत होता, त्यातच सोसाट्याचा वारा सुटला होता.


धरणावरच गरम चहा आणि भजीची दुकाने आहेत. तेथे गरम गरम भजी आणि चहा घेतला आणि पुन्हा धरणाच्या  भिंतीवर जाउन फोटो काढले.धरण पूर्ण भरून ओसंडून वाहत होते.





संध्याकाळ झाली आणि परतायची झाली. जेवढा जमेल तेवढा निसर्ग डोळ्यात साठवून आम्ही सगळे नाशिकला निघालो.


भंडारदरा धरणावर कसे जायचे?
जर मुंबईहून जाणार असाल तर सकाळी लवकर कसारा ट्रेन पकडून कसारा स्टेशनच्या बाहेरच जीप आणि ओम्नी वाले उभे असतात त्यांना घोटी बस स्टोप सांगणे आणि तेथून बस अथवा कोणतेही वाहन करणे. स्वतःचे चारचाकी वाहन असेल तर उत्तम. धरणापासून काही अंतरावर हॉटेल्स असल्याने जेवणाची सोय होते.

माझा  ब्लोग कसा वाटला ते कॉमेंट्स मध्ये अथवा मेलने नक्की कळवा.

धन्यवाद ,
निशांत पोतदार